राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याचं सांगण्यात येत आहे. हे सर्व खासदार नवीन गट तयार करून नंतर शिंदे गटात विलिन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटासाठी गेल्या चार वर्षातील हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या घडामोडीनंतर शिंदे गटाचे बळ वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदेंची ताकदही वाढणार असून राज्यातील त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढणार आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याने तर बळ वाढल्याने एकनाथ शिंदे भविष्यात मुख्यमंत्रीही होतील, असा दावा केला आहे.
शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडकर मीडियाशी संवाद साधत होते. ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात ते मुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीस दिल्लीत देशाचं नेतृत्व करणार आहेत. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
आमचे ऑपरेशन 365 दिवस
आमचे ऑपरेशन 365 दिवसही असतो. मुळात उद्धव ठाकरे यांना त्यांच्याकडे असलेले आमदार आणि खासदारांना सांभाळता येत नाही. आता आमच्याकडे किती येत खासदार आहेत हे आताच सांगता येणार नाही. पण एक सोडून सर्वच येत आहेत, असं सूचक विधान भोंडेकर यांनी केलं.
तर त्यांचे स्वागत आहे
2022 मध्ये जे झालं, त्यानंतर परत आज ते घडत आहे. तरीही राऊत आरोप करत आहे. मुळात त्यांना त्यांच्या खासदारांना सांभाळता येत नाही का? इकडचे असो की तिकडचे आम्ही सर्व सोबत आहोत. उद्धव ठाकरेंना वेळ मिळत नसेल तर खालच्या लोकांनी सांभाळून घ्यावे. कोणी आमच्या पक्षात येत असेल तर त्यांचे स्वागत आहे, असं ते म्हणाले.
अजून दोन दिवस शिल्लक
ऑपरेशन टायगर आम्ही तयार केलेलं नाही. त्यांना तिकडे समाधान मिळत नाहीये म्हणून ते इकडे येत आहेत. लवकरच येणार आहेत. वर्धापन दिनाला अजून दोन दिवस शिल्लक आहेत, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
राऊतही आमच्याकडे येतील
खासदारांना 15 कोटी रुपये अगाऊ रक्कम मिळाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांचा हा दावा भोंडेकर यांनी खोडून काढला. मला वाटते की 15 कोटींच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. भविष्यात संजय राऊत देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असा टोला त्यांनी लगावला.
फडणवीसांनी संमती दिली तर…
संजय राऊत आणि इतरांनीही समन्वय ठेवायला पाहिजे होता. ठाकरेंकडची सेकंड टीम चांगली नाहीये. किती आमदार आहेत हे केवळ शिंदे यांना माहीत आहे. परंतु आमचा पक्ष मोठा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले राज्य चालवत आहेत. मात्र भविष्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. फडणवीस संमती देतील तेव्हा शिंदे मुख्यमंत्री बनतील. फडणवीस यांच्यात क्षमता आहे, ते देशाचे नेतृत्व करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.