Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आणखी एक संधी, अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळणार?
Tv9 Marathi June 19, 2026 03:45 AM

टीम इंडियाचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याची काही दिवसांपूर्वीच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी निवड करण्यात आली. वैभवला भारतीय संघात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वैभवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करण्यात आली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर वैभव श्रीलंका दौऱ्यात ट्राय ए सीरिज खेळत आहे. मात्र वैभवला या मालिकेतील तिन्ही सामन्यांत त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. मात्र त्यानंतरही वैभवला आणखी एक संधी मिळणार आहे.

टीम इंडियासमोर अंतिम फेरीत कुणाचं आव्हान?

टीम इंडिया ट्राय सीरिजमधील अंतिम सामन्यात खेळणार आहे. वैभवला या सामन्यात संधी मिळणार हे निश्चित आहे. भारतीय संघाने या मालिकेत यजमान श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर भारताला अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे सलग 2 पराभवांमुळे भारतासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना हा करो या मरो असा झाला होता. मात्र भारतीय संघाने 17 जून रोजी अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताने यासह अंतिम फेरीत धडक दिली. आता भारतीय संघासमोर अंतिम सामन्यात कुणाचं आव्हान असणार? हे 19 जूनला होणाऱ्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

अफगाणिस्तान-श्रीलंका सामना

श्रीलंका ए विरुद्ध अफगाणिस्तान ए यांच्यात शुक्रवारी 19 जून रोजी सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीप्रमाणेच आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत होणऱ्या संघाचं इथेच आव्हान संपुष्ठात येईल. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळू शकते.

वैभवच्या 4 सामन्यांत किती धावा?

भारतीय संघात निवड झाल्यानंतर वैभवची ही पहिलीच मालिका असल्याने युवा फलंदाजाच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष होतं. वैभवने या चारही सामन्यात दुहेरी आकडा गाठला. मात्र वैभवला एकाही सामन्यात अर्धशतक करता आलं नाही. वैभवने या 4 सामन्यांत 14, 44, 21 आणि 38 अशा धावा केल्या. त्यामुळे वैभव अंतिम सामन्यात मोठी खेळी करुन साखळी फेरीतील भरपाई करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.