मुंबई : धाराशिवमधील खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल आज सीबीआय न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला. न्यायालयाने मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे, खासदार ओमराजेंना (Omraje nimbalkar) हा मोठा धक्का मानला जात आहे. याप्रकरणी, आता सीबीआयकडून (CBI) उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. तर, दुसरीकडे सत्याचा विजय झाला, असे म्हणत पाटील कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. निकालानंतर दोन्ही कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिल्या असून पद्मसिंह पाटील यांचे वकिल अॅड. भूषण महाडिक यांनीही भूमिका मांडली.
हे सर्व प्रकरण तथाकथित आहे, या गुन्ह्यातील सर्व सूत्रधार बाजूला ठेवून राजकीयदृष्ट्या खोटा खटला त्रास देण्यासाठी दाखगा ल केला. याप्रकरणातील माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या साक्षीने प्रकरण गृहित धरता येत नाही, अशी प्रतिक्रिया पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी दिली. कंळबोली पोलिसांनी याप्रकरणात दीड वर्षे तपास केला, मयताच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून तपास केला, पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री असताना त्यांना बदनाम करण्यासाठी हे सर्व केले, असेही आरोपींचे वकील भूषण महाडिक यांनी म्हटले. मारिया यांचाही जबाब नोंदवण्यात आला, त्यांनीही माझा काही संबंध नाही असे म्हटले. त्यामुळे, माफीचा साक्षीदार असलेला जैन हा खोटारडा व्यक्ती आहे हे स्पष्ट झालं, असेही वकील भूषण महाडिक यांनी म्हटले. दरम्यान, वकिलांनी फेब्रुवारी 2009 पासूनच्या खटल्यातील घडामोडींवरही भाष्य केलं.
न्यायालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर निराश, म्हणाले, यापेक्षा दुर्दैव ते काय. मला वाटतं न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. या खटल्याच्या निकालासाठी 20 वर्षांचा मोठा कालावधी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं, हे मान्य केले आहे, तरीही सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, कोर्टाच्या निकालाचे पूर्ण वाचन करुन आणि सीबीआय काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. पोलिसांच्या तपासात त्रुटी होती, ही वस्तुस्थिती आहे, कारण पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती, हा तपास सीबीयाकडे द्या. नंतर सीबीआयने तपास केला, मात्र मध्ये तीन वर्षे गेली. वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे, राजकीय वैमनस्य असल्याचे कोर्टाने मान्य केले, मग पवनराजेंची हत्या कोणी केली, असा सवाल सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला.
जो आरोप आमच्यावर केला, ज्याने आमचं सगळंच कुटुंब उध्वस्त झालं, आमच्या मनावर परिणाम झाला. राजकीय नुकसान झालंच, पण मानसिक त्रास खूप झाला, राजकीयदृष्ट्या आम्ही दोघा नवरा-बायकोने खूप त्रास सहन केला. आमची गेलेली वर्षे भरुन निघणार नाहीत, पण आज निश्चितच समाधान आहे, रडू येतंय, ज्या भावना आहेत त्या सांगता येत नाहीत. आम्हाला मानसिक त्रास खूप झाला, नववीतील मुलांना तुरुंगात भेटायला जावं लागायचं, राणादादा आणि मी सुद्धा लोकांची कामे करायला आणखी त्वेषाने मतदारसंघात फिरलो. जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा ग्रामपंचायत, विरोधक नेहमीच तोच मुद्दा काढून बोलायचे. तोच तोच मुद्दा, अगदी पहिल्या निवडणुकीपासून मी तर हातात मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते, लोकांना सांगत होते की आम्ही कोणाचा खून केला नाही, असे म्हणताना अर्चना पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.