एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जवळपास अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य़मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले.
या फुटीनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे यावेळी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हे सर्व खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या खासदारांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर केंद्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढणार आहे. मात्र आता या सर्व घडामोडी सुरू असतानाच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे, त्यांनी मोठा दावा केला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ?’ असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.
भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा.
राजकारण मजेशीर…— Asim Sarode (@AsimSarode) June 20, 2026
दरम्यान दुसरीकडे ओमराजे यांनी देखील शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. आज पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे, मी अजून पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.