महाविकास आघाडीने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या चहापानाच्या निमंत्रणावर भूमिका स्पष्ट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
भास्कर जाधव म्हणाले की, सरकारकडून चहापानासाठी निमंत्रण देण्यात आले असले तरी त्याला उपस्थित न राहण्यामागची भूमिका यापूर्वीही अनेकदा स्पष्ट करण्यात आली आहे. सरकारचे अपयश, निर्णय प्रक्रियेतील त्रुटी आणि जनतेच्या प्रश्नांबाबत असलेली उदासीनता यामुळे सरकारसोबत चहापानाला जाणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यासमोर दुष्काळाचे संकट उभे राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने यासाठी कोणती तयारी केली आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. दुष्काळ आणि पाणीटंचाईची शक्यता सरकारला आधीपासून माहिती होती, असे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले होते. मात्र, या संकटाचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचे दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.
सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असल्याने अशा परिस्थितीत सरकारसोबत बसून चहापान करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत महाविकास आघाडीचा बहिष्कार कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखल्याचे संकेत मिळत आहेत.