विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निकालानंतर विविध मतदारसंघांमध्ये झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग आणि फुटलेल्या मतांची आकडेवारीही समोर येत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अनेक ठिकाणी पक्षनिहाय अपेक्षित मतदान झाले नसल्याने मतफुटीचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सुमारे 39 मतं फुटल्याचे बोलले जात आहे. अमरावतीमध्येही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले असून तेथे तब्बल 94 मतांची फूट झाल्याची चर्चा आहे.
जळगावमध्ये महाविकास आघाडीची 90 मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर धाराशिव-लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीची तब्बल 146 मतं फुटल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे, सांगली-सातारा मतदारसंघात महायुतीला धक्का बसल्याचे चित्र असून तेथे सुमारे 100 मतं अपेक्षित उमेदवारांपासून दूर गेल्याचे बोलले जात आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातही महायुतीची 35 मतं फुटल्याची चर्चा रंगली आहे.
सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकमध्ये महायुतीच्या मतांमध्ये मोठी फूट पडल्याचे सांगितले जात आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मिळालेल्या 357 मतांमागे महायुतीतील मोठ्या प्रमाणातील क्रॉस व्होटिंग कारणीभूत ठरल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे.
या निकालांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय निष्ठा, पक्षांतर्गत नाराजी आणि क्रॉस व्होटिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, आगामी निवडणुकांपूर्वी सर्वच पक्षांसाठी हा चिंतनाचा विषय ठरणार आहे.