पती-पत्नीमध्ये भांडणं होणं, वादविवाद या सामान्य गोष्टी आहेत. परंतु अनेकदा ही भांडणं टोकाला पोहोचतात आणि त्यातून ज्याची आपण कल्पना देखील केली नसेल अशा गोष्टी घडतात. जसं की कधी-कधी हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं तर कधी कधी रागाच्या भरामध्ये अगदी एखाद्याच्या पती किंवा पत्नीच्या हत्येपर्यंत ही गोष्ट जाते. या सर्वांना कारणीभूत अनेकदा मोबाईल देखील असतो. पती किंवा पत्नी जर सतत फोनवरच बोलत असेल तर अशावेळी आपल्या जोडीदाराबद्दल मनात संशय निर्माण होऊ शकतो. आणि एकदा मनात संशय निर्माण झाला की, त्यानंतर घरात वादविवाद सुरू होतात. दरम्यान एका प्रकरणामध्ये न्यायालयाने महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे.
दिल्लीच्या साकेत न्यायालयाने एका घरगुती हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिपणी केली आहे. एखादी महिला जर रात्री उशिरापर्यंत एखाद्या पुरुषासोबत बोलत असेल तर केवळ या एका गोष्टीमुळे तिच्या चारित्र्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह लावू शकत नाहीत. हा तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा आधार होऊ शकत नाही. पुढे न्यायालयाने असं देखील म्हटलं आहे की, केवळ या एका गोष्टीवरून तुम्ही संबंधित महिलेचे कॉल डिटेल्स, सीडीआर रिपोर्ट मागवू शकत नाहीत, असं करणं हे त्या महिलेच्या वैयक्तिक आयुष्यात दखल दिल्यासारखं होईल.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शुनाली गुप्ता यांनी संबंधित व्यक्तीची पत्नीचे सीडीआर तपासण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. आपली पत्नी रात्री उशिरापर्यंत कोणासोबत तरी बोलत असते, तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आहेत, सीडीआर तपासण्यात यावेत अशी याचिकाकर्त्याची मागणी होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे, पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आहेत, याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. जर अशा पद्धतीने कॉल डिटेल्स तपासण्यात आले तर हा त्या संबंधित महिलेल्या वैयक्तीक आयुष्यात दखल दिल्यासारखे होईल अशी टिपणीही यावेळी न्यायालयाने केली आहे, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.