Jain Muni Nileshchandra on Raj Thackeray: मुंबईमिरा-भाईंदर आणि लालबाग परिसरात सोसायट्यांबाहेर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी जैन समाजाला कडक शब्दांत तंबी दिली आहे. “व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांततेत राहा,” असा सल्ला देत राज ठाकरेंनी “वर दोन गुजराती बसले आहेत म्हणून काहीही करू नका,” अशा शब्दांत इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जैन समाजात फूट पाडणाऱ्या काही राजकीय नेत्यांची आणि संतांची यादीच आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले की, “कोणत्याही राजकीय नेत्यांच्या चक्करमध्ये येऊन जैन समाजामध्ये फूट टाकण्याचं काम करू नका. मिरा-भाईंदरपासून ते लालबागपर्यंत विनाकारण काम करत आहेत. यामध्ये काही नेते पण आहेत. पार्टीचा प्रचार करणारे संत पण आहेत. जैन समाज हा राजकीय लोकांच्या नादाला लागत नाही, पण काही लोक आहेत ते जैन नेत्याच्या नादाला लागून आहेत. त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. राज साहेबांनी त्यांचाही समाचार घ्यावा. तुमची आणि माझी ओळख फार जुनी आहे. ज्यांनी हा वाद निर्माण केला त्यांचाही समाचार घ्या, तुमच्या स्टाईलमध्ये त्यांचाही इलाज करा. त्यांचं नाव पत्ता सगळं मला माहिती आहे. मला सहकार्य करा. महाराष्ट्रामध्ये जो मराठी आणि गुजराती वाद आहे, त्याला आपणच संपवू शकता. माझ्याबद्दल काही गैरसमज झाले असतील तर भेटून त्याचं समाधान करू,”
राज ठाकरे म्हणाले होते की, “राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकावू नका. आमची डोकी भडकली तर केवढं होईल? तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, ते निघून गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात, विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक इथे राहतात. पूर्वीपासून गुजराती लोक इथे राहत आहेत, मात्र आत्ताच गेले दहा ते बारा वर्षात हे कधी सुरू झालं? जैन पंथाचे मुनी माझ्या घरी येऊन गेले, तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा,” असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा