Dada Bhuse on TET Exam Paper Leak: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर लीक (Paper Leak) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महत्त्वाची माहिती दिली असून, "या गैरप्रकाराची शासनाने गंभीर नोंद घेतली असून मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, पाठीमागच्या काळामध्ये नीट (NEET) परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटीचे प्रकरण घडले होते, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने देखील यंदा पूर्ण काळजी घेतलेली होती. परंतु, आज पहाटे ठाणे भिवंडी पोलिसांच्या माध्यमातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडीमध्ये काही इसमांकडे टीईटीचा पेपर उपलब्ध असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली.
पोलिसांनी तातडीने या विषयावर कारवाई करत मोठी ॲक्शन घेतली आणि संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक पडताळणी दरम्यान, या संशयितांकडून मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांमध्ये साम्य आढळले आहे. हा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर बाब असून, पोलीस प्रशासनाच्या चौकशीमध्ये ज्या काही बाबी समोर येतील त्याप्रमाणे दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
या पेपरफुटीच्या संशयानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून 28 जून रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेत पोलीस प्रशासनाला या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचे आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही."
टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थी कडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच 37 शहरातील 1028 परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, असंही प्रिया शिंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा