आयर्लंडसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला दणका दिला आहे. त्यामुळे मालिका विजय सोडा, आता मालिका वाचवण्याची वेळ टीम इंडियावर आहे. दुसरा टी20 सामना जिंकला तरच ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात केलेल्या चुका सुधारण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. बेलफास्टमध्ये टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने टीम इंडियाला 34 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात फक्त अभिषेक शर्माची बॅट तेवढी चालली. त्याने आयर्लंडच्या गोलंदाजांना धुवून काढलं. पण त्याच्या फलंदाजीच्या जोरावरही टीम इंडियाला काही विजय मिळवता आला नाही. आयर्लंडने विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडिया 148 धावांवरच सर्वबाद झाली. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पराभूत होण्याची नामुष्की ओढावली.
टीम इंडियाला 182 धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही म्हणून फलंदाजांवरच खापर फुटलं. पण अभिषेक शर्माने फलंदाजी नाही तर गोलंदाजीमुळे पराभूत झाल्याचं सांगितलं. अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘एक बॉलिंग युनिट म्हणून त्यांनी ज्या भागात गोलंदाजी केली ती आमच्यापेक्षा चांगली होती. एक टीम म्हणून तुम्ही असंच शिकता. आम्हाला या सामन्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकायला मिळालं.’ अभिषेक शर्माने पुढे सांगितलं की, आयर्लंडमध्ये थंड वातावरण असून भारतीय संघाला ते भावलं. कारण मागच्या तीन महिन्यांपासून खेळाडू उकाड्यात खेळत होते. पण असं असूनही वातावरणाशी काही जुळवून घेता आलं नाही. त्याचा परिणाम झाला. इतकंच काय तर बेलफास्टची खेळपट्टी देखील भारतीय खेळपट्ट्यांपेक्षा वेगळी होती.
अभिषेक शर्माने भारतीय गोलंदाजांबाबत थेट असं काही बोललं नाही तर त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. बेलफास्टमधील मैदान डाव्या आणि उजव्या बाजूला मोठं होतं. पण मागच्या आणि पुढच्या भागात जवळ होतं. या ठिकाणी भारतीय गोलंदाजांनी चूक केली. आयर्लंडच्या फलंदाजांना सरळ मारण्याची अधिक मिळाली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली. त्यांनी फक्त दोन षटकात 46 धावा ठोकल्या. जर चेंडू थोडा लांब आणि आखुड टप्प्याचा ठेवला असता तर सरळ मारणं कठीण गेलं असतं. तसेच फटकेबाजी करताना विकेट पडल्या असत्या. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगने असं केलं. पण प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर तसं करण्यात अपयशी ठरले.