राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली त्या-त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे, या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांची पहिला सभा बंडखोर सासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये मुंबईत झाली होती.
त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा ही वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघात पार पडली आहे, यावेळी बोलताना त्यांनी वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी या मतदारसंघातून 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल
दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी दौऱ्यावला निघालो आहे, काहीजण म्हणाले उद्धव ठाकरे फिरत नाही, म्हणून म्हणालो आता दाखवतो खरी शिवसेना काय आहे ते? शिवसेना कुठेही गेलेली नाही, शिवसौनिक जिथे आहेत, तिथेच आहेत. परंतु आता आपल्याला गद्दारीला थारा द्यायचा नाही, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर केला आहे. शिवसेना ठाकरे गटातून ज्या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामध्ये संजय देशमुख यांचा देखील समावेश आहे. दरम्यान त्यापूर्वी शुक्रवारी मुंबईवरून नागपूरला येताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता, या विमान प्रवासाची चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.