ओमराजे निंबाळकर यांचे मंत्रिपदाबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, पद मिळवण्यासाठी..
Tv9 Marathi June 28, 2026 04:45 PM

ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज धाराशिव दाैरा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिलाच हा उद्धव ठाकरे धाराशिव दाैऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. आज उद्धव ठाकरे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करू शकतात. यादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना म्हटले की, अनेक लोकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत, मला वाटते की, मी त्यांना न्याय देऊ शकेल. आमची काही मंडळी विरोधात राहून सगळ्याच सत्ताधारी पक्षाचा वापर करून एकाधिकारशाही चालवली होती. विरोधकांना पार चिरडण्याचे काम सुरू होते, मला वाटते ते थांबवण्याचे निश्चितपणे काम मी करून दाखवील. नाराजी रास्त आहे… कारण त्यांनी माझ्यावर प्रेम केले. म्हणूनच ते राग व्यक्त करतात.

पण मी घेतलेला निर्णय काही काळ गेल्यानंतर योग्य होता हे मी निश्चितपणे त्यांच्या सर्वांच्या साथीनेच सिद्ध करून दाखवेल. टीका करणाऱ्यांनी निश्चितपणे टीका करावी.आज जर पूर्ण राज्यात बघितले तर माझ्याबद्दल ज्या भावना आहेत, त्या माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे व्यक्त होतात. मी हा निर्णय का घेतला? या गोष्टीला मी टिकेतून उत्तर देण्यापेक्षा मी माझ्या कामातून उत्तर देईल. सर्वसामान्य माणसात राहणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझं काम मी कुठेही थांबणार नाही.

अजून दुप्पट तिप्पट वेगाने करणार आहे. माझ्या कामातूनच मी सर्व गोष्टींना उत्तर देणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेबद्दल बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, मला निश्चितपणे उद्धव ठाकरेंचा आदर आहे. मी जो काही निर्णय घेतला त्यामागे जी कारणे आहेत, ती मी मांडली आहेत. मी त्यात कुठेही त्यांच्यावर दोषाआरोप केली नाहीत. मी मला येणाऱ्या माझ्या लोकांच्या अडचणी आणि त्या लोकांना जर मला न्याय द्यायचा असेल तर आम्ही किती दिवस म्हणायचे की, हा मागासलेला मतदार संघ आहे.

किती वर्ष लोकांना सांगायचे की, आपला मागासलेला जिल्हा आहे. त्या सर्व सामान्य माणसासाठी मी हा निर्णय घेतला असे मला वाटते. मला सर्वांनासोबत घेऊन काम करायचे आहे. मी जसा लोकांना 24 तास वेळ लोकांना देतो, तसा वेळ एकनाथ शिंदे लोकांना देतात. मी कोणत्याही मंत्रि‍पदाची अट ठेऊन हा निर्णय घेतला नाही. पद मिळवण्यासाठी मी तिकडे जात नाही. विष पचवल्यासारखा हा निर्णय आहे. मागच्या 10 दिवसातील टीका बघितले तर कुठल्याही सामान्य मानसाला ती सहन होणारी नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.