लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी कळल्या असत्या… संजय जाधवांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका, थेट..
Tv9 Marathi June 28, 2026 05:45 PM

शिवसेना नेते उद्धव ठाकरे परभणी दाैऱ्यावर आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. परभणीचे बंडखोर खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे फिरले नाही म्हणतात. तेव्हा कोण फिरलं होतं. त्या दौऱ्यात राहुलसोबत होता. हा गद्दार कुठे होता. मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आपण शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. तिथून आपण कर्जमुक्तीची मागणी केली होती. कोणत्याही दौऱ्यात हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, असं तो म्हणाला. बरोबर आहे. लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी कळल्या असत्या. लक्ष दिलं पाहिजे होतं. आता तुम्ही लक्ष द्या. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड दिला. तुम्ही हा आसूड मला दिला. आता हा आसूड तुम्ही चालवायचं आहे.

या वर्षी संघाला 100वर्ष झाले. भाजप आणिबाणी नंतर जन्माला आलेला पक्ष आहे. आमचे तीन खासदार आणि राज्यसभेत एक आहे. पुरेसे आहेत. तीन खासदार राहिले म्हणजे शिवसेना संपली नाही. खासदार संजय जाधव यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यादरम्यान मी शेतकऱ्यांना भेटत असताना हे कुठेही नव्हते असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

पुढेउद्धव ठाकरे यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नाही. जनता आणि मतदार म्हणजे पक्ष आहे. दोन तृतियांश सभासद इकडे तिकडे गेले आणि विलीन झाले तर त्यांना कायदेशीर मान्यता मिळते का. उल्हास बापट म्हणतात, नाही. उल्हास बापट बुजुर्ग कायदेतज्ज्ञ आहेत. दोन तृतियांश प्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेत नाही. कायद्याचं राज्य असेल तर ते बाद झाले पाहिजे. मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवर विस्वास आहे. सुरुवात वरून झाली पाहिजे.

लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. घटनेनुसार योग्य आहे ते लोकसभा अध्यक्षाने केलं पाहिजे. अधिकार आणि मर्जी यात फरक आहे. आम्ही अधिकार मानतो. मर्जी मानत नाही. त्यांना वाटत असेल सहावा आला म्हणजे झालं. ते होत नाही. कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत, असा माझा समज आहे. जे पदावर बसले आहेत. त्यांनी घटनेचं उल्लंघन करू नये. घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून तुमची इतिहासात नोंद होऊ देऊ नका.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.