आयपीएस विश्वास नांगरे पाटील हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर गेल्याने चर्चेत आले आहेत. नांगरे पाटील यांच्या आरएसएसच्या मंचावर जाण्यावरून राज ठाकरेंनी टीका केली होती. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नांगरे पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. आता या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी आता शिवसेनेच्या शाखेत यावं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कान टोचले.
उद्धव ठाकरे यांनी परभणीतील पत्रकार परिषदेत राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आयपीएस नांगरे पाटील यांचेही कान टोचले. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी शिवसेनेच्या शाखेत यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वल्लभभाई पटेल यांनी बंदी आणली होती. चंद्रकांत पाटील यांना इतिहास सांगावा लागेल. हे म्हणतात सरदार पटेल यांना पंतप्रधान करायला हवं होतं. पटेल खरंच पंतप्रधान हवे होते. कारण त्यांनी संघावर बंदी आणली होती’.
एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जो शिवसेनेशी इमान राखू शकत नाही, तो देवेंद्र फडणवीस यांच्याशीही इमान राखू शकत नाही’ . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाकरे म्हणाले, ‘ मी कर्जमुक्ती दिली होती. यांनी कर्जमाफी दिली आहे. माफी ही गुन्हेगाराला दिली जाते. शेतकऱ्यांना नाही. शेतकरी अन्नदाता आहे. त्याचं आपल्यावर ऋण आहे. कोणतीही अट न टाकता मी दोन लाखापर्यंतचं पीक कर्ज मुक्त केलं होतं. दोनच वेळा सेवा केंद्रावर गेल्यावर थेट खात्यात पैसे गेले होते. करोना सुरु झाला. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार देणार होतो. कोरोनामुळे झालं नाही, पण जेव्हा द्यायला सुरु केली, तेव्हा यांनी सरकार पाडलं’.
ठाकरेंनी यावेळी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या बैठकीत मी ऑनलाईन होतो. लोकसभेनंतर आपण भेटतो. या बैठका वारंवार झाल्या पाहिजे. शिवसेना आणि भाजपची युती २५ वर्ष टिकली. त्यासाठी तळागाळातील कार्यकर्ता उभा राहिला होता. महाविकास आघाडी टिकवायची असेल तर एका पक्षाची जबाबदारी नाही. सर्वांची आहे. तसेच सर्वांचे कार्यकर्ते एकजूटीने कामाला लागले पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. मविआत स्थानिक पातळीवर एक वाक्यता पाहिजे’.