IRE vs IND : दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची नामुष्की
Tv9 Marathi June 29, 2026 02:45 AM

टी20 वर्ल्डकप विजेत्या संघावर दुबळ्या आयर्लंडकडून पराभवाची नामुष्की ओढावली आहे. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत आयर्लंडने भारतीय संघाला 2-0 ने पराभूत केलं आणि व्हाईटवॉश दिला. क्रिकेट इतिहासात आयर्लंडने भारतीय संघाला पहिल्यांदाच टी20 क्रिकेटमध्ये व्हाईटवॉश दिला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघावर दुबळ्या संघाकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. संघात दिग्गज खेळाडूंची भरणा असूनही पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतीय संघावर लाजिरवाण्या पराभवाची नोंद झाली आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आयर्लंडने 20 षटकात 8 गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही भारतीय संघाला गाठता आलं नाही. हे आव्हान गाठताना भारतीय संघाला 153 धावा करता आल्या आणि हा सामना 1 धावेने गमावला.

आयर्लंडने दिलेल्या 155 या विजयी धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद झाले. त्यांना खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला. इशान किशन 12, श्रेयस अय्यर 10, अक्षर पटेल 14, शिवम दुबे 20, सूर्यांश शेडगे 1 धावा करून बाद झाले. भारताकडून तिलक वर्माने 46 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 55 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. हार्षित राणाने 10 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 21 धावांची खेळी करून बाद झाला.

शेवटच्या षटकात काय झालं?

भारताला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. हार्षित राणा आणि अर्शदीप सिंग मैदानात होते. स्ट्राईकला असलेल्या अर्शदीप सिंगला पहिला चेंडू वाइड मिळाला. त्यानंतरच्या चेंडूवर 1 धाव आली. दुसरा चेंडू नो बॉल टाकला आणि 2 धावा आल्या. त्यामुळे 5 चेंडूत 15 धावा अशी स्थिती आली. फ्री हिट असलेल्या चेंडूवर हार्षित राणाने चौकार मारला आणि 4 चेंडूत 11 धावा अशी स्थिती आली. तिसऱ्या चेंडूवर हार्षित 1 धाव काढली. हॅरी टेक्टरने चौथा चेंडू वाइड टाकला, म्हणून हा चेंडू पुन्हा टाकण्याची वेळ आली. तसेच एक अतिरिक्त धावा मिळाली. पुन्हा टाकलेल्या चौथ्या चेंडूवर 1 धाव मिळाली आणि 2 चेंडू 8 धावांवर स्थिती आली. पाचव्या चेंडूवर हार्षित राणाची विकेट गेली आणि सामना आयर्लंडच्या पारड्यात झुकला. प्रिन्स यादवने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. पण हा सामना भारताने एका धावेने गमावला.

पहिल्या टी20 सामन्यात काय झालं?

पहिल्या टी20 सामन्यात आयर्लंडने भारतीय संघा 34 धावांनी पराभूत केलं होतं. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावा दिल्या होत्या. पण भारतीय संघाला 18.5 षटकात सर्व गडी गमवून 148 धावांपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्यात अभिषेक शर्मा वगळता इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.