पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूरमधील साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या संतापजनक प्रकारानंतर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली जात होती. आरोपी भीमराव कांबळेने १ मे रोजी हादरवणारं कृत्य केलं होतं. नराधमाच्या विरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर कोर्टाने आज सोमवारी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘नराधम भीमराव कांबळेला भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
नरसापूर प्रकरणाचा 55 दिवसांनी निकाल लागला. या प्रकरणात नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्व स्तराकडून स्वागत केले जात आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जो निर्णय आला, मी या प्रकरणात तेथील ग्रामीण पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानते. नराधमाने क्रूरपणे चिमुकलीची हत्या केली होती. ज्या दिवशी नराधमाला फाशी होईल, त्या दिवशी चिमुकलीला न्याय मिळेल. माझं म्हणणं आहे की, भर चौकात फाशी द्यावी.
महाराष्ट्राचं पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलिसांचे खरंच आभार मानायला पाहिजे. कोर्टाचे देखील आभार मानले पाहिजे. ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी आम्ही यात राजकारण आणायचं नाही, असं ठरवलं होतं. आम्ही या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून आलो होतो. त्यांनी आम्हाला शब्द दिला. त्यामुळे पोलीस दल, कोर्टाचे राजकारण बाजूला ठेवून आभार मानते. सगळ्यांनी मिळून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचा पहिला टप्पा गाठला आहे. माझी मुख्यमंत्री आणि कोर्टाला नम्र विनंती आहे की, या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा व्हावी. खरंतर त्याला ठेचून काढलं पाहिजे. परंतु आपला देश संविधानानुसार चालतो, त्यामुळे त्याला लवकरात लवकर भर चौकात फाशी द्यावी’.