गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राभर पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतो. बदलत्या वातावरणामुळे अनेकदा किचनमधले मसाले लवकर खराब होतात. याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील वाढलेली आर्द्रता. जास्त आर्द्रतेच्या संपर्कात आल्याने मसाले ओलसर होतात आणि हळूहळू त्यांचा सुगंध व चव नाहीशी होते. तर काही मसाल्यांना बुरशी किंवा कीड लागण्याचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच पावसाळ्यात मसाले अधिक काळजीपूर्वक साठवून ठेवणे आवश्यक असते.
मसाले कोणत्याही पदार्थाची चव आणि सुगंध वाढवतात. जर ते योग्य प्रकारे साठवले नाहीत, तर त्यांचा दर्जा लवकर खालावू शकतो आणि पदार्थाच्या चवीवर याचा परिणाम होऊ शकतो. जरी आर्द्रतेचा प्रत्येक मसाल्यावर सारखा परिणाम होत नसला तरी, पावसाळ्यात जवळपास सर्वच मसाल्यांच्या काळजीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे, पावसाळ्यात मसाल्यांना आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी काय करावे आणि ते साठवताना कोणत्या चुका टाळाव्यात, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
पावसाळ्यात मसाल्यांना दमटपणापासून वाचवण्यासाठी या किचन हॅक्सचा वापर करापावसाळ्यात मसाल्यांमध्ये दमटपणा तयार होऊ नये म्हणून ते नेहमी हवाबंद डब्यांमध्ये ठेवा. मसाले काढताना नेहमी कोरडा व स्वच्छ चमचा वापरा. मसाल्यांचे डबे गॅस स्टोव्ह, सिंक किंवा वाफ व पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. अख्ख्या मसाल्यांमधील दमटपणा कमी करण्यासाठी त्यांना अधूनमधून सूर्यप्रकाशात ठेवत रहा.
आवश्यक असल्यास फूड-ग्रेडचे सिलिका जेल पॅक किंवा ओलावा शोषून घेणारे पॅक देखील वापरले जाऊ शकतात, परंतु त्यांचा मसाल्यांशी थेट संपर्क येऊ नये. मसाले जास्त दिवस खराब होऊ नयेत म्हणून ते कमी प्रमाणात खरेदी करा. योग्य साठवणुकीमुळे मसाल्यांची चव, सुगंध आणि गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.
पावसाळ्यात मसाले साठवून ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात?मसाले उघड्या किंवा झाकण नसलेल्या डब्यांमध्ये ठेवणे टाळा. ओल्या हातांनी किंवा ओल्या चमच्याने मसाले काढल्याने त्यांमध्ये ओलावा साचू शकतो. तसेच मसाले फ्रिजमध्ये ठेवणे टाळा, कारण बाहेर काढल्यावर तापमानातील बदलामुळे त्यांमध्ये ओलावा तयार होऊ शकतो.
स्वयंपाकघरात वापरले जाणारे मसाले सूर्यप्रकाश आणि उष्णता असलेल्या ठिकाणी ठेवणे टाळा. एकाच भांड्यात जुने आणि नवीन मसाले एकत्र ठेवल्याने त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो.
मसाल्यांमध्ये ही लक्षणे दिसताच त्याकडे दुर्लक्ष करू नये?जर मसाल्यांचा नेहमीचा तीव्र सुगंध नाहीसा झाला असेल, त्यांचा रंग बदलला असेल, तसेच ओलसर लागत असतील तर हे मसाले खराब होण्याची चिन्हे असू शकतात. याव्यतिरिक्त जर मसाल्यांवर बुरशी, लहान कीटक लागले असतील किंवा त्यांना विचित्र वास येत असेल, तर ते वापरणे टाळावे.
खराब झालेले मसाले केवळ अन्नाची चवच बिघडवत नाहीत, तर आरोग्यावरही दुष्परिणाम करतात. त्यामुळे मसाले खराब झाल्याची कोणतीही चिन्हे दिसल्यास ते ताबडतोब बदलणे उत्तम.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)