Monsoon Fishing Ban Extended: पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली; मत्स्यसाठा संवर्धन व मच्छीमार सुरक्षेला प्राधान्य
esakal June 30, 2026 03:45 AM

पाली : मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी एक निराशाजनक तर, निसर्ग आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत राज्य शासनाने मोठी वाढ केली असून, आता ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

या निर्णयामुळे बाजारात ताजी मासळी येण्यासाठी खवय्यांना आता आणखी १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी राज्याच्या सागरी हद्दीत १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी घालण्यात येत होती. मात्र, आता त्यात बदल करून हा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.

विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून ही बंदी वाढवण्याची सातत्याने मागणी होत होती. यावर जिल्हा समिती आणि राज्य सल्लागार समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

ही आहेत मुख्य कारणे

  • मत्स्यसाठ्यांचे संवर्धन: माशांना प्रजननासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा सुरक्षित राहावी.

  • लहान माशांचे संरक्षण: मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच जाळ्यांमध्ये अडकणाऱ्या लहान माशांची (पिल्लांची) शिकार रोखणे.

  • जीवित आणि वित्तहानी टाळणे: पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे समुद्रात मच्छीमारांच्या जिवावर बेतू नये यासाठी सुरक्षेचा उपाय.

परराज्यातील नौकांना कडक इशारा

राज्यात मासेमारीवर बंदी असताना अनेकदा परराज्यातील नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन घुसखोरी करतात. यावर शासनाने कडक भूमिका घेतली आहे. बंदीच्या काळात इतर राज्यांतील कोणत्याही मासेमारी नौकांनी महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात येऊन अनधिकृत मासेमारी केल्यास, त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाकडून अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमही मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे समुद्राच्या पर्यावरणाला नक्कीच फायदा होईल, मात्र ताज्या मासळीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांचा सध्या तरी हिरमोड झाला आहे.

वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे जतन व संवर्धन होण्यास मोठी मदत होईल, तसेच मच्छीमारांची सुरक्षाही अबाधित राहील.

नितेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.