अयोध्या येथील श्री राम मंदिर तसेच संस्थानाचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सुपूर्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एका पत्राद्वारे केली आहे. अयोध्या येथील राम मंदिर संस्थानात झालेली चोरी आणि कथित भ्रष्ट कारभारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बेअब्रू होत असल्याचा दावा करत सुबोध सावजी यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ही आग्रही मागणी केली आहे.
राम मंदिरात चोरी करणाऱ्यांना मरेपर्यंत फाशी द्या – सुबोध सावजीअयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि राम मंदिरात चोरी करणाऱ्या दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी सुद्धा त्यांनी पत्रात केली आहे. तसेच शेगावच्या गजानन महाराज संस्थांच्या पारदर्शक कारभाराचा आदर्श आणि दुसरीकडे भारतीय लष्कराची असलेली प्रामाणिकता , शिस्त लक्षात घेता, अयोध्या राम मंदिराचे सर्व नियंत्रण या दोन्हीपैकी एका यंत्रणेकडे सोपवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुबोध सावजी यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात सुबोध सावजी यांनी म्हटले की, आपणाकडे आमची मागणी आहे की श्रीराम मंदिर आयोध्या व श्री राम मंदिर संस्थान अयोध्या येथे झालेला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार याची पूर्णपणे चौकशी करून चोरी करणाऱ्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपण श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे आला होता. आपण श्री गजानन महाराज संस्थान मध्ये श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन गण गण गणात बोते असा नामस्मरण केले.
श्री गजानन महाराज संस्थान हे भारतात एक आदर्श संस्थान आहे असा आपण उल्लेख केला होता. भारतीय लष्करात असलेली प्रामाणिकता ती लक्षात घेता हा सर्व कारभार श्री गजानन महाराज संस्थान शेगाव किंवा भारतीय लष्कर यांचे सुपूर्त करावा. आमची मागणी जलद गतीने कार्यान्वित करावी ही आग्रहाची विनंती. दरम्यान, आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पत्राबाबत नेमका काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.