Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले…
Tv9 Marathi July 07, 2026 08:45 PM

विधानसभेतील चर्चेदरम्यान भाजप आमदार तथा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या कथित वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी आज सभागृहात याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा करत, मृत्यू किंवा दुर्घटनेची खिल्ली उडवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या परिसरात विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना अमित साटम यांनी, “काल झाडांवर होतं, आज मॅनहोलवर आलं,” असे म्हणत हसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या कथित वर्तनावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत संवेदनशील विषयांवर जबाबदारीने वागण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली होती.

या वादावर आज विधानसभेत भूमिका स्पष्ट करत अमित साटम म्हणाले की, गेल्या आठवड्यात ते माध्यमांशी संवाद साधत असताना जयंत पाटील तेथे आले होते. त्यावेळी दोघांमध्ये एका वेगळ्याच विषयावर हलक्याफुलक्या स्वरूपात संवाद सुरू होता आणि त्याच संदर्भात त्यांनी काही शब्दांची देवाणघेवाण केली होती.

साटम यांच्या मते, त्यानंतर जयंत पाटील तेथून निघून गेले. मात्र, त्या संवादातील एक छोटा भाग वेगळा काढून त्याचा संदर्भ बदलण्यात आला आणि एका वृत्तवाहिनीवर तो प्रसारित करण्यात आला. त्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर हसल्याचा चुकीचा संदेश गेला, असे त्यांनी सांगितले.

“मी कोणाच्याही मृत्यूवर हसलो नव्हतो. माझ्या वक्तव्याचा संदर्भ बदलून दाखवण्यात आला. त्यामुळे माझ्याविषयी चुकीचा समज निर्माण झाला,” असे स्पष्ट करत अमित साटम यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली.

दरम्यान, या स्पष्टीकरणानंतरही या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण कायम आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.