संजू सॅमसनने स्वत:च पायावर मारून घेतला धोंडा? टीममधून वगळल्याच्या प्रकरणानंतर ट्वीस्ट
GH News July 08, 2026 12:10 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातून संजू सॅमसनला वगळल्याने बराच गोंधळ उडाला. संजू सॅमसनला अचानक टीम बाहेर बसवल्याने टीकेची झोड उठली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर रडारवर आले. आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. एका ताज्या रिपोर्टच्या दाव्यानुसार, मँचेस्टर टी20 सामन्यात संजू सॅमसनने स्वत:च न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळाली. आयर्लंड विरूद्धच्या दोन आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन फेल गेला होता. त्यामुळे मँचेस्टर टी20 सामन्यात त्याने स्वत:च न खेळण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाचं संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला क्रीडाप्रेमींनी धारेवर धरलं. पण आता या बातमीला नवं वळण लागलं आहे.

संजू सॅमसनने स्वत:च हा निर्णय घेतला?

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याचं सांगितलं जात आहे. संजू सॅमसन सलग तीन सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता. त्यामुळे त्याने मँचेस्टर टी20 सामन्यात बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. रिपोर्टनुसार, संघ आणि संजू सॅमसन या दोगांना एकमेकांवर विश्वास आहे आणि सॅमसनला माहिती आहे की, टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेच्या तयारीसाठी त्याची भूमिका महत्त्वाची आहे.

…पण वाद झिम्बाब्वे दौऱ्याबाबत?

मँचेस्टर टी20 सामन्यांच्या प्लेइंग 11 मध्ये बेंचवर बसण्याचा निर्णय त्याचा स्वत:चा असेल. पण झिम्बाब्वे दौऱ्यातून वगळण्याचा निर्णय काही विचित्र असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्याच्या जागी संघ प्रभसिमरन सिंगला जागा मिळाली. टीम इंडियाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, संजू सॅमसनला आराम दिला गेला आहे. तर काही रिपोर्टनुसार, संजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट झाला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादव याच्यासोबत झालं, अगदी तसंच.. त्यामुळे आता खरं आणि काय खोटं तेच कळेना.. त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. मात्र आता जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने अंदाज बांधत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.