IND vs ENG: आवडता खेळाडू संजूलाच ड्रॉप का केलं? गौतम गंभीरने दिलं न पटणार कारणं, वर्ल्ड कप हिरो सॅमनसनचा गेम फक्त…
Tv9 Marathi July 08, 2026 12:45 PM

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या पराभवामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-2 ने मागे पडला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 201 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा दबाव भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होता, कारण भारतीय संघ अवघ्या 11.4 षटकांत 76 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेचा विषय बनले.

202 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ केवळ 76 धावांवर बाद झाला. या पराभवामुळे, 2026 च्या टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संजू सॅमसनला संघातून वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर यांनी सॅमसनबद्दल आपले मत व्यक्त केले. “या विषयावर संजू सॅमसनसोबत झालेले त्याचे संभाषण पूर्णपणे स्पष्ट होते, परंतु खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा सार्वजनिक केली जाऊ शकत नाही.” आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसन अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. परिणामी, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या जागी त्याला संघातून वगळण्यात आले.  गंभीरने सांगितले की, “सॅमसनला संघातील त्याच्या भूमिकेबद्दल पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे.”

गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाला, “मी संजू सॅमसनला आवश्यक असलेले स्पष्टीकरण दिले आहे.ौ हे संभाषण केवळ खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यातील आहे आणि ते बाहेर कोणालाही सांगितले जाणार नाही. संजूच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे स्पष्ट आहोत. त्याने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण कधीकधी, खेळाडूचा सध्याचा फॉर्म देखील विचारात घेणे आवश्यक असते. तो या मालिकेत परत येऊ शकत नाही, असा कोणताही नियम नाही.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे वैयक्तिक खेळाडूंबद्दल नाही, तर योग्य संघ संयोजन तयार करण्याबद्दल आहे. वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्यात आली कारण व्यवस्थापनाला त्याच्या आणि अभिषेक शर्माच्या सलामीच्या जोडीवर विश्वास होता. या खराब कामगिरीची जबाबदारी केवळ एका खेळाडूवर नाही. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यांवर संपूर्ण भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे निकालांबद्दल आहे. त्यामुळे, आम्ही असे संयोजन मैदानात उतरवतो, ज्यातून आम्हाला चांगले निकाल मिळण्याची अपेक्षा असते. माझा नेहमीच विश्वास आहे की प्रत्येक खेळाडूला त्याचे स्थान स्वतः कमवावे लागते.”

भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना, गंभीरने कबूल केले की, “संघ परिस्थितीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकला नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या बाबतीत, आम्ही चांगली कामगिरी केली नाही. आयर्लंड असो वा इंग्लंड, सत्य हेच आहे.  जर आम्ही परिस्थितीनुसार चांगला खेळ केला असता आणि उत्तम क्रिकेट खेळलो असतो, तर कदाचित आम्ही सलग चार सामने हरलो नसतो.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.