Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाने ही तीन काम केलीच पाहिजेत, अन्यथा आयुष्यात येते पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
Tv9 Marathi July 10, 2026 12:46 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाला मोलाचा सल्ला दिला आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाची कर्तव्ये काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? तसेच कुटुंब प्रमुखाने आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात घरातील कुटुंब प्रमुख हा त्या घराचा मुख्य आधार असतो. तुम्ही कधी फुलांची माळ पाहिली आहे का? ज्या प्रमाणे एक धागा सर्व फुलांना एकत्र करतो, तीच भूमिका घरात कुटुंबप्रमुखाची असते. तो धागाच जर निसटला तर ती फुलं कधीही एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते. कुटंबप्रमुख हा त्या घराचा आधार असतो, भिंत असतो. कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी कुटुंबप्रमुखाची काही कर्तव्य देखील सांगितली आहेत.

मुलांचं शिक्षण – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही झालं तरी चालेल परंतु घरातील मुलं ही अशिक्षित राहता कामा नये, कारण मुलं ही कोणत्याही कुटुंबाचा आणि कुटुंबातील वृद्ध व्यक्तींचा आधार असतात, तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं नाही, तर त्यांना रोजगार मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ते तुमचा चांगला सांभाळ करण्यास असमर्थ ठरतील, तुमच्यावर भविष्यात पश्चातापाची वेळ येऊ शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संस्कार – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही होऊ द्या, परंतु आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास कधीही विसरू नका, मुलं जेव्हा लहान असतात, तेव्हा काय चांगलं? काय वाईट यांची ओळख त्यांन नसते. जर या वयात त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत, तर भविष्यात त्यांना वाईट वळण लागू शकतं. त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा आई-वडील म्हणून मुलांवर चांगले संस्कार घडवण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

बचत – चाणक्य म्हणतात या जगात पैशांशिवाय कोणतंही काम होत नाही, जर तुमच्याकडे पैसा असेल तर कोणतंही संकट तुमच्यावर येऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही शंभर रुपये कमवत असाल तर त्यातील 25 रुपयांची बचत करा आणि हे पैसे आपल्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.