किती मिरच्या, किती जळजळ, किती मळमळ..; विधान परिषदेत शिंदेंची तुफान फटकेबाजी, पवारांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाला घेरलं
Tv9 Marathi July 10, 2026 08:45 PM

आज पाऊसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. त्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती, यावरून देखील शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा माझं काम सुरु होतं. आम्ही खोटी सहानुभूती दाखवणारे नाहीत, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

अनेक जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात पण आम्ही कधी त्याबद्दल देवेंद्रजींना विचारलं नाही, आणि त्यांनी पण आम्हाला विचारलं नाही. कारण आमचा दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे. पण जे लोक अशा पद्धतीने विचार करतायेत ते लोक स्वत:ची फसगत करतायेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, पवार साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत. ही संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. पण तुम्ही किती खालच्या थरावर बोलणार? जेवढं तुम्ही खालच्या थरावर बोलात तेवढं तुम्ही खाली खाली जाल. तुम्ही आपलाच खड्डा खोदतायेत. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि आमच्यामध्ये दरी निर्माण करू शकत नाहीत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,  सीम प्रश्नाच्या बैठकीनंतर जाता जाता पवार साहेब तिकडे माझ्या दालनात आले, त्यांना त्यांच्या काही लोकांना भेटायचं होतं. तेव्हा मी वर कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आले आहेत. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते आपल्या दालनात बसले आहेत, म्हटल्यावर मी ताबडतोब तिकडे गेलो. ती आपली संस्कृती आहे. मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. अरे काय किती मिरच्या किती पोटदुखी, किती जळजळ किती मळमळ यांना जलोशील चालणार नाही, त्यांना जमालगोटा पाहिजे, अशी फटकेबाजी यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.