दोन वेळा सलग वर्ल्ड चॅम्पियन बनलेला भारतीय संघ अचानक एका विजयासाठी तरसत आहे. आयपीएल 2026 (IPL 2026) नंतर टीम इंडियाला आधी आयर्लंडने दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्हाईटवॉश (क्लीन स्वीप) दिला, आणि आता इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 ने धूळ चारली. ब्रिटन दौऱ्यावर टीम इंडियाला विजयाचे खातेही उघडता आले नाही. 2024 आणि 2026 चा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ इंग्लंड आणि आयर्लंडच्या खेळपट्ट्यांवर एखाद्या क्लब टीमसारखा खेळताना दिसला. यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या या लाजीरवाण्या कामगिरीचे खरे कारण सांगितले आहे.
संजय मांजरेकरांनी ब्रिटन दौऱ्यातील टी20 सामन्यांमधील या पराभवासाठी खेळाडूंना दोष देण्याऐवजी आयपीएलशी संबंधित समस्या दूर करण्याचे आवाहन केले आहे, तसेच भारतीय संघाची निवड आयपीएलच्या कामगिरीच्या आधारावर केली जाऊ नये असे म्हटले आहे. मांजरेकरांनी ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिले की, “विदेशी भूमीवर मिळालेल्या या पराभवासाठी खेळाडूंना सहज जबाबदार धरले जाऊ शकते, परंतु मला असे वाटते की त्या लोकांना जबाबदार धरले पाहिजे ज्यांनी आयपीएलला फलंदाजांसाठी अधिक अनुकूल बनवले आहे, ज्यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण होतो.”
ते पुढे म्हणाले, “निवडकर्त्यांसमोरील (Selectors) खरे आव्हान हे आहे की, त्यांनी आयपीएलमधील कामगिरीच्या दबावात न येता अशा फलंदाजांची निवड करावी जे परदेशात चांगली कामगिरी करू शकतात. त्यांनी अशा फलंदाजांचा शोध घेऊन त्यांनाच भारतासाठी निवडले पाहिजे. भारताला आता टी20 क्रिकेटमधील आपले बहुतांश सामने परदेशात खेळायचे आहेत. आता घरच्या मैदानांवरील क्रिकेटची मजा संपली आहे.”
आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्ट्या तयार केल्या जातात, ज्यामुळे ‘पावर-हिटिंग’ला (मोठे फटके मारण्याला) प्रोत्साहन मिळते, या कारणासाठी अनेकदा आयपीएलवर टीका केली जाते. याशिवाय आयपीएलमध्ये बाउंड्री (सीमारेषा) देखील लहान असतात. तसेच ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमानेही हा खेळ फलंदाजांसाठी अधिक सोपा आणि अनुकूल बनवला आहे.