अभिनेते पवन कल्याण मुंबईच्या रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? मोठी अपडेट समोर
Tv9 Marathi July 12, 2026 08:45 PM

Pawan Kalyan Hospitalised : मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन कल्याण यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन्ही खांद्यांमध्ये रोटेटर कफ आणि स्नायूंची गंभीर दुखापत होती आणि ते गेल्या बऱ्याच काळापासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त होते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दोन्ही खांद्यांची शस्त्रक्रिया एकत्र केल्यास रिकव्हरीच्या काळात जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून सुमारे साडेतीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत फक्त उजव्या खांद्यावरच उपचार करण्यात आले. डाव्या खांद्याची शस्त्रक्रिया सुमारे दोन महिन्यांच्या अंतराने केली जाणार आहे. दरम्यान, पवन कल्याण यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी चंद्रबाबू नायडू हे कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना भेटायला पोहोचले आहेत.

कोण आहेत पवन कल्याण?

पवन कल्याण हे दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील मोठे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलेलं असून त्यांचे लाखोंनी चाते आहेत. प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचे ते छोटे भाऊ आहेत. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी कमाल करून दाखवलेली आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील आहे. सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर आता ते राजकारणात सक्रीय आहेत. 2008 सालापासून ते आंध्र प्रदेशातील राजकारणातील ते प्रमुख चेहरा आहेत. 2014 साली त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. जनसेवा पक्ष असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.

पवन कल्याण हे अभिनेते असल्याने त्यांचे वैयक्तक आयुष्यही वेळोवेळी चर्चेत राहिले. पवन कल्याण यांनी तीन वेळा संसार थाटला. त्यांनी पहिले लग्न 1997 साली केले. नंदिनी त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते. परंतु त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. 2008 साली नंदिनी आणि पवन कल्याण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2009 साली त्यांनी रेणू देसाई यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा 2012 साली घटस्फोट झाला. अन्ना लेजनेवा यांच्याशी त्यांनी तिसरे लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.