त्या किंकाळ्या, तो अन्याय विसरले! टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर निघाली; BCCI लवकरच मान्यता देणार, त्यासाठी अफगाणिस्तानला...
esakal July 14, 2026 08:45 PM

India tour of Bangladesh 2026 latest news: मागच्या वर्षी बांगलादेशात सत्तापालट झाले.. त्या दरम्यान झालेल्या उद्रेकात हिंदूंवर प्रचंड अत्याचार करण्यात आला... त्या किंकाळ्या, त्या वेदना भारतीयांपर्यंत पोहोचल्या आणि सोशल मीडियावर बांगलादेशविरुद्ध क्रिकेट संबंध नको, अशी मागणी झाली... आयपीएलम फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) बांगलादेशी गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याला करारमुक्त केले. वाढलेल्या तणावामुळे भारताचा बांगलादेश ( IND vs BAN) दौरा स्थगित केला गेला. त्यानंतर बांगलादेश संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात खेळण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. पण, झालं गेलं, गंगेला मिळालं... अशा भूमिकेत BCCIआल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तशी बातमीच समोर आली आहे.

भारताच्या बांगलादेश दौऱ्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दौऱ्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धची प्रस्तावित तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका पुढे ढकलली जाऊ शकते. भारत-अफगाणिस्तान यांच्यातली ही मालिका १३ सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

India Cricket News : मला मोकळं करा...! टीम इंडियात 'भूकंप'; IND vs ENG मालिका ठरणार शेवटची, गौतम गंभीर...

पण, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मालिका १७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे श्रीलंका कसोटींनंतर भारतीय संघाला बांगलादेश दौऱ्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. बांगलादेश क्रिकेट बोर्ड ( BCB) सप्टेंबरमध्ये सहा सामन्यांची व्हाईट-बॉल मालिका आयोजित करण्यास उत्सुक आहे.

२०२४ मध्ये बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर जवळपास दोन वर्षांनी बांगलादेशी नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर मागील आठवड्यातच भारताने व्हिसा देणे पुन्हा सुरू केले आहे. "आम्ही या भारतीय संघाच्या दौऱ्याबद्दल आशावादी आहोत. आम्हाला BCCI कडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही, पण त्यांनी नकारही कळवलेला नाही. त्यामुळे आम्हाला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे," असे बीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

IND vs ENG: ९६८ दिवसांचा दुष्काळ संपला! रोहित, विराट आणि बुमराह विश्वचषक फायनलनंतर पहिल्यांदाच एकत्र वनडे खेळणार; कोहलीचा ३०० वा डाव!

बीसीबीचे नवनिर्वाचित अध्यक्ष तमीम इक्बाल याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, बांगलादेशचा माजी कर्णधार स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीतून काही सकारात्मक संकेत घेऊन परतला आहे. ही मालिका गेल्या वर्षी होणार होती, परंतु दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. बीसीबी संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, तमीमने सांगितले होते की, त्याला या मालिकेबद्दल आशा आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.