राज्याच्या हवामानात आठवडाभरापासून बदल झालेला आहे. जून महिन्यात मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला होता. राजधानी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आठवडाभरापासून पावसाने अचानक दांडी मारली आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला कधी सुरूवात होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पुढील 5 ते 7 दिवस पावसाची शक्यता नाहीहवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील 5 ते 7 दिवस संपूर्ण राज्याला पावसाची प्रतीक्षा कायम असणार आहे, या काळात राज्याच्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नसल्याचे सानप यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या 4-5 दिवस तरी मुसळधार पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. मात्र तोसुद्धा सर्वदूर असण्याची शक्यता नाही.
मेघदूत अॅप वापरण्याचा सल्लाराज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, यावर बोलताना सानप यांनी म्हटले की, शेतकऱ्यांनी पावसाच्या आणि शेतीच्या नियोजनासाठी मेघदूत अॅपचा वापर करावा. या अॅपमध्ये हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयक माहिती मिळेलय एल निनोचा प्रभाव असला तरी पाऊस पडतो. मात्र तो सगळीकडे सारख्या प्रमाणात नसतो. या काळात काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो.
संपूर्ण देशात 20 जुलैनंतर पावसाची शक्यताहवामान तज्ज्ञांच्या मते, 20 जुलैपर्यंत देशातील बहुतांश भागात मान्सूनचा वेग मंद राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती होण्याची शक्यता असून त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. असे झाल्यास पावसाची तूट भरून निघण्यास मदत होईल आणि खरीप पिके तसेच पेरणीच्या कामांनाही वेग मिळू शकतो. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीपासून वंचित रहावे लागणार आहे.