लग्नानंतर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. यात घर, पैसा, नोकरी, विश्वास आहेच. पण शरीरसंबंध सुद्धा नातं भक्कम करण्यासाठी तितकेच महत्वाचे असतात. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये शरीरसंबंध नसतील तर संसार मोडायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील हे प्रकरण आहे. महिलेने पती विरोधात तक्रार नोंदवली आहे. लग्न तर केलं पण नवरा शरीर संबंध ठेवणं टाळतो, तो सतत पळत असतो असा आरोप महिलेने केला आहे. गोरखपूरच्या गोरखनाथ पोलीस ठाण्यात आलेल्या या 30 वर्षीय महिलेने पती आणि सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ, मानसिक त्रास देण्याचा आरोप केला. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
लग्नानंतर पतीने अजूनपर्यंत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले नाहीत, असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. कधी औषधाच्या बहाण्याने तर कधी कुठल्या दुसऱ्या कारणाने नवरा लांब पळायचा. याला कंटाळून महिला नवऱ्याला रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेली. डॉक्टरांनी नवऱ्याला तपासणीसाठी स्पर्म द्यायला सांगितले. पण नवऱ्याने नकार दिला. सासरकडचे लोक नवऱ्याच्या उपचाराच्या नावाखाली 5 लाख रुपयांची मागणी करत होते असा महिलेचा आरोप आहे. पैसे द्यायला नकार दिला तर सासरी छळ सुरु झाला असं महिलेने म्हटलं आहे.
आजपर्यंत त्याने संबंध ठेवलेले नाहीत
गोरखनाथ पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरुन पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेने सांगितलं की, 19 नोव्हेंबर 2021 रोजी तिचं लग्न लखनऊमध्ये राहणाऱ्या युवकासोबत झालं. या लग्नात 15 लाख रुपये खर्च झाले. लग्नानंतर ती सासरी आली तेव्हा तिला मानसिक दृष्ट्या त्रास द्यायला सुरुवात झाली. गरजेच्या गोष्टी सुद्धा तिला सासरी दिल्या जात नव्हत्या. पती सुद्धा तिच्यापासून लांब पळायचा. आजपर्यंत त्याने संबंध ठेवलेले नाहीत.
तिला धक्के मारुन घराबाहेर काढलं
पीडित महिलेनुसार, जेव्हा कधी तिने या बद्दल नवऱ्याला विचारलं, त्यावेळी तो प्रत्येकवेळी कारण देऊन टाळायचा. विषय बदलायचा. सासरची मंडळी नवऱ्याच्या उपचारासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणण्यासाठी तिच्या मागे लागलेले. तिने नकार दिला, तेव्हा तिला धक्के मारुन घराबाहेर काढलं. गोरखनाथ पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय प्रताप सिंह यांच्यानुसार, महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पती आणि सासरकडच्या पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरु आहे.