Jayant Patil : असा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण दादांच्या निधनानंतर सीन..जयंत पाटलांनी जे काय आहे ते स्पष्टच सांगून टाकलं
Tv9 Marathi July 15, 2026 03:45 PM

काल रात्री वर्षावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल होते. त्यावरुन राजकारणात विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. आता यावर स्वत: जयंत पाटील यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. “मी ईश्वपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलो. निर्णय चुकीचा झाला एवढच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. निवदेन दिलं नाही. अशी काही भानगड नाही” असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर ते म्हणाले की, “प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी विलिनीकरणासंदर्भात कधी भेट झाली नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्नच उदभवत नाही” त्यावर पत्रकाराने विचारलं की, मग, विलिनीकरणाची चर्चा आता थांबलाीय का, त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणाबरोबरही झालेली नाही. त्यामुळे ती थांबलीय असा शब्दा वापरण्याची गरज नाही. जे सुरु असतं, ते थांबतं. दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे” अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं.

म्हणून काही योगायोग असेल तरी त्यातून राजकीय अर्थ निघतोय

विनोद तावडे यांच्यासोबत पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या भेटीसंदर्भातही जयंत पाटील बोलले. “विधानसभा संयुक्त संसदीय समितीची ओबेरायच्या वरच्या मजल्यावर बैठक होती. दुसऱ्याबाजूला बँकर्सची बैठक होती. टेबल मांडलेले तिथे. सुप्रिया ताईना तिथे मी भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी विनोद तावडेंसोबत कॉफी घेतली” असं जयंत पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यात सध्या काही घडामोडी अशा घडतायत की त्यातून दोन्ही पक्ष जवळ येत चालल्याचं चित्र दिसत आहे. म्हणून काही योगायोग असेल तरी त्यातून राजकीय अर्थ निघत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.