धरणं 88% भरली… तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
Tv9 Marathi July 28, 2026 02:45 PM

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील काही भागांमध्ये आज, 28 जुलै रोजी तात्पुरत्या स्वरूपात 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पांजरापूर पंपिंग स्टेशनवर सुरू असलेल्या महत्त्वाच्या तांत्रिक कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पांजरापूर पंपिंग स्टेशनमधील 6.6 केव्ही उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 29 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत मुंबईच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर आधीच 10 टक्के पाणीकपातीचा सामना करत असताना आता अतिरिक्त 15 टक्के पाणीकपात लागू झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. ऐन पावसाळ्यातही पाणीपुरवठ्यावर निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणांमधील एकूण पाणीसाठा सुमारे 88 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, त्यामुळे भविष्यात पाणीस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पाणीकपात तातडीने मागे घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महापालिकेच्या माहितीनुसार, ऑक्टोबरपूर्वी पाणीकपात हटविण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. परतीचा पाऊस समाधानकारक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने पाणीकपात मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.