विद्यार्थी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर विविध गाण्यांवर आधारित रील्स व्हायरल झाल्या. मात्र सर्वाधिक प्रभाव टाकणारं गाणं ठरलं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'मंटो' या चित्रपटातील 'बोल के लब आजाद हैं...' दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'मंटो' चित्रपटातील हे गाणं जंतर-मंतर आंदोलनाचं जणू प्रतीकच बनलं. आजही इन्स्टाग्रामवर आंदोलनाशी संबंधित अनेक व्हिडीओंमध्ये हे गाणं पार्श्वसंगीत म्हणून ऐकायला मिळत आहे.
आठ वर्षांनंतर पुन्हा लोकप्रिय
'बोल के लब आजाद हैं...' हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याला अपेक्षित लोकप्रियता मिळाली नव्हती. मात्र विद्यार्थी आंदोलनामुळे या गाण्याला नव्याने ओळख मिळाली आहे. आंदोलन संपल्यानंतरही या गाण्यावर मोठ्या प्रमाणावर रील्स तयार केल्या जात असून सोशल मीडियावर ते सातत्याने ट्रेंड होत आहे. या गाण्याचं चित्रिकरण मुख्यत्वे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री रशिका दुगल यांच्यावर करण्यात आलं असून, ते चित्रपटाच्या आशयाचं प्रभावीपणे प्रतिनिधित्व करतं. 'बोल के लब आजाद हैं...' हे गाणं प्रसिद्ध गायक राशिद खान आणि विद्या शाह यांनी गायलं आहे. या गाण्याचं संगीत स्नेहा खानवलकर यांनी दिलं आहे.