दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन संपल्यानंतर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या घरी परतले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जंगी स्वागत करत पुष्पहार घालून जयघोष केला.
सुमारे 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “भारतात परत आल्यापासून मी आंदोलनातच होतो. मागील 36 दिवस आम्ही जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष केला. आमच्या लढ्याला यश मिळालं असून, हा विजय संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा आहे. इतक्या दिवसांनंतर आई-वडिलांना भेटण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांनी सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं. “20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई अत्यंत दुर्दैवी होती. आंदोलनानंतरही विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना घरी जाऊन धमकावलं जात आहे. विद्यार्थी दहशतवादी नाहीत, ते देशाचं भविष्य आहेत,” असं दीपके यांनी सांगितलं.
अभिजीत दीपके यांनी पुढे इशारा देत म्हटलं की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत विद्यार्थ्यांचा संघर्ष यशस्वी झाला. मात्र, सरकारने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि योग्य भूमिका घेतली नाही, तर हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलण्याची ताकद ठेवतात.”
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची पुढील भूमिका काय असेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघटना पुढे कोणती दिशा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.