जुन्नर: जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील नाणेघाट परिसरातील अंजनावळे व घाटघर येथे प्रस्तावित असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे आदिवासी भागात तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रकल्पाला आदिवासी भागातील नागरिकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या प्रकल्पामुळे गोर गरीब आदिवासी नागरिकांच्या जमिनी जाण्यासोबतच त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे आदिवासी समाजाच्या नेत्यांकडून बोलले जात आहे.
नाणेघाट परिसरातील अंजनावळे व भोरांडे येथे अदानी रिन्यूएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड, अहमदाबाद यांच्यावतीने १,५०० मेगावॉट क्षमतेच्या 'पंप्ड स्टोरेज' जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, पुणे-२ यांच्या वतीने पश्चिम भागातील जवळपास 29 ग्रामपंचायतीसाठी 21 ऑगस्ट रोजी अंजनावळे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीमध्ये प्रकल्पग्रस्त, पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या संस्था तसेच प्रभावित नागरिकांनी तोंडी किंवा लेखी स्वरूपात सूचना, हरकती व आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न झाल्यास हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही. शासनाने पश्चिम आदिवासी भागाला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे. या भागात उत्खननाबाबत निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या प्रकल्पामुळे अंजनावळे, घाटघरसह अनेक गावांतील आदिवासींच्या जमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यापुढील काळात आदिवासी समाजावर अन्याय झाल्यास या प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्ष करण्याचा इशारा माजी आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे.
पेसा कायद्यानुसार ग्रामसभेच्या ठरावाला कायदेशीर महत्त्व असून 21 ऑगस्ट पूर्वी आदिवासी भागातील सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन प्रस्तावित प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, जमिनींचे होणारे नुकसान आणि स्थानिकांवरील परिणाम याबाबत ठराव मंजूर करावेत असे आवाहन देखील बेनके यांनी केले आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या उभारणीने भविष्यात आदिवासी भागातील शेतकरी भूमिहीन होऊन पर्यावरण, जैवसंपदा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, माणिकडोह धरणाच्या पाणीपातळीवर होणारा परिणाम या संभाव्य धोक्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची भावना सुकाळवेढेचे सरपंच दत्ता गवारी यांनी व्यक्त करत प्रकल्पासाठी निवडण्यात आलेली जागा ही पेसा व अनुसूचित क्षेत्रात येते. त्यामुळे राज्य शासन, केंद्र शासन अथवा खाजगी व्यावसायिक ही जागा अधिग्रहित करू शकणार नाही. ग्रामसभा हेच सरकार आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचे ठराव करावेत असे आवाहन देखील गवारी यांनी केली आहे.
नेमका काय आहे प्रकल्प
फेब्रुवारी 2022 मध्ये अदानी कंपनीने या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावाबाबत ऊर्जा विभाग आणि कंपनीमध्ये 28 जून 2022 रोजी सामंजस्य करार झाला. या प्रकल्पाची अंदाजे खर्च सुमारे 7048 कोटी रुपये आहे. या प्रकल्पात अंजनावळे (आडोशी) येथे वरचा जलाशय, तर ठाणे जिल्ह्यातील भोरांडे येथे खालचा जलाशय प्रस्तावित आहे. वरच्या जलाशयातील पाणी टर्बाइनद्वारे खाली सोडून वीजनिर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी भूमिगत वीजगृह, पंप-टर्बाइन यंत्रणा आणि दोन्ही जलाशयांना जोडणारे बोगदे उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी सुमारे 166 हेक्टर जमीन आवश्यक असून त्यामध्ये 105 हेक्टर बिगर वनजमीन आणि 60 हेक्टर वनजमीन समाविष्ट आहे. आडोशी येथे सुमारे 30 मीटर, तर भोरांडे येथे 64 मीटर उंचीचे धरण उभारण्याचे प्रस्तावित आहे.
या ग्रामपंचायतींना जनसुनावणीसाठी देण्यात आली नोटीस
तळेरान, घाटघर, अंजनावळे, देवळे, खटकाळे, निमगिरी, आंबोली, जळवंडी, केवाडी, चावंड, पुर, भिवाडे बुद्रुक, उच्छील, भिवाडे खुर्द, हातविज, इंगळून, आंबे, सोनावळे.