पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये पाच जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 533 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर दुसऱ्या यादीत 17 लाख शेतकऱ्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुढील यादीत स्थान देण्यात आले आहे.
कर्जमुक्ती योजनेतून राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल. कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 36 हजार 585 कोटी रुपये लागणार आहेत. तर 2019 मधील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अजून 4 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
कधी प्रसिद्ध होणार दुसरी यादी?
पहिल्या यादीतून वंचित राहिलेल्या अथवा ज्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत. अशा शेतकऱ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागलेले आहे. ही दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महाआयटीच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील बँकांनी महाआयटी प्रणालीवर 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. त्यातून पुढील टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
पहिल्या यादीत केवळ 2 लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचाच समावेश करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. अथवा ज्यांची खाती उर्वरीत वर्गवारीत येतात. त्यांचा समावेश पुढील टप्प्यात प्रसिद्ध होणाऱ्या याद्यांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
तीन टप्प्यात कर्जमाफी
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजना ही तीन टप्प्यात पार पडणार असल्याचे सांगितले. ऑगस्टच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 553 आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना 40 हजार कोटी रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यांचे कर्जखाते निरंक करण्यात येणार आहे . थकबाकीची दोन लाखांची रक्कम माफ केली जाणार आहे. कर्जमाफीविषयीच काहीही तक्रारी असतील तर दुरूस्त केली जाणार असल्याचे भरणे यांनी आश्वासन दिले आहे. कर्जमाफीची योजना सुटसुटीत आहे. यादीत योग्य कागदपत्र दिली तर लाभ नक्कीच मिळेल असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.