शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तकचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डिलीमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे. डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला घटना बदलायची आहे, म्हणून पक्ष फोडले जात आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
हे राजकीय पक्षांना देखील वापरतात, आणि त्यांचं काम झालं की फेकून देतात. तुम्ही रामाला देखील वापरून फेकून दिलं आहे. ज्या रामाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटताना तुम्हाला लाज नाही वाटत? तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर म्हणतात बघा यांनी हिंदूत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? मुळात प्रश्न आहे तुम्ही आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज, लज्जा आणि शरम सोडली होती, मग आता फरक काय पडतोय? असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तिकडे हा प्रकार सुरू आहे, ते घराणेशाहीवर बोलतात, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही पण तिची एक परंपरा आहे आणि तिचा मला अभिमान आहे. आमच्या घराण्याचा इतिहास किमान शंभर वर्ष ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? याचा काही आगा पिछा नाहीये, आणि जाबादारी तर त्याहून नाहीये, मेरा क्या मै तो झोला लेके निकल जाऊंगा, मग देश का क्या होगा? म्हणून मी म्हणतो कौतुक ऐकन अन् ठाकरे कुटुंब या दोन टोकाच्या दोन गोष्टी आहेत. कारण आम्हाला ते नाही पटत, आम्ही अन्याय आणि ढोंगावर लाथ मारून पुढे जाणारे लोकं आहोत. जे सत्य आहे, त्याच्या खांद्याला खांदा लावून चालणारं आमचं कुटुंब आहे, आणि हीच आमची शिवसेना आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.