छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या हायकोर्ट टायपिंग कौशल्य परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून, त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. अभिजीत दीपके यांनी विद्यर्थ्यांना आता परीक्षा केंद्रवारून उठायचं नाही असं ठामपणे सांगितले आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. कीबोर्ड निकृष्ट दर्जाचे होते, काही जणांना छोटी स्क्रीन दिसत होती, तर काहींना सूचनाही स्पष्टपणे मिळाल्या नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा नीट देऊ शकले नाहीत आणि त्यांना अपयश आले. “आम्ही सहा महिन्यांपासून तयारी करत होतो, पण ही सिस्टीम फेल झाल्यामुळे आमचे भविष्य धोक्यात आले आहे,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले. या प्रकारामुळे काही विद्यार्थी इतके निराश झाले आहेत की त्यांना आत्महत्येचे विचार येत असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभिजीत दीपकेंना त्यांच्या समस्या सविस्तरपणे सांगितल्या आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. परीक्षेतील या गोंधळामुळे अनेक मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यात आहे.