Madhuri Dixit:बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या अभिनयाने आणि मनमोहक अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ पडताना दिसते. आता ती 'कोण होणार करोडपती'या (Kon Honar Karodpati) शोमधून नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. चाहत्यांसह माधुरीही या शोचं प्रचंड उत्सुक आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातील कथा, त्यांची स्वप्नं आणि त्यांच्या संघर्षांबद्दल जवळून जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळणार असल्याचं तिने सांगितलं आहे.माधुरीनी या शोसाठी होकार का दिला? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता.आता खुद्द माधुरी दीक्षितनेच यामागचं कारण सांगितलं आहे.
‘कोण होणार करोडपती’साठी होकार देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे या कार्यक्रमात दडलेल्या सामान्य माणसांच्या कथा, असं माधुरीने सांगितलं. ती म्हणाली की, “ज्या गोष्टीने मला लगेच उत्साही झाले, ती म्हणजे लोकांच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी.‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकण्याचा कार्यक्रम नाही. तर, स्वतःची स्वप्नं पाहण्याचं धाडस आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वासाची ही कहाणी आहे.
या क्विझ शोमधून प्रेक्षकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल, असंही माधुरीने सांगितलं. अभिनय करताना कलाकाराला एखाद्या व्यक्तिरेखेत शिरावं लागतं, मात्र सूत्रसंचालन करताना त्यांना स्वतःसारखं राहण्याची संधी मिळते. मला वाटतं,‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रेक्षकांना माझा अधिक स्पॉन्टेनियस आणि सहज अंदाज पाहायला मिळेल. अभिनेत्री म्हणून तुम्हाला एखाद्या व्यक्तिरेखेत शिरावं लागतं, पण इथे मी फक्त स्वतःसारखी राहू शकते. लोकांसमोर बसून त्यांच्या कथा ऐकू शकते आणि त्यांना जवळून जाणून घेऊ शकते.”स्पर्धकांसोबत होणाऱ्या गप्पा, त्यांच्या भावना, हसणं-खेळणं, सरप्राइज आणि अचानक घडणारे क्षण यासाठी माधुरी विशेष उत्सुक आहे.“मला संवाद साधायला खूप आवडतं. त्यामुळे अशा खऱ्या आणि अनपेक्षित गप्पांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत हे खास क्षण शेअर करता येतील, अशी मला आशा आहे,” असं माधुरी दीक्षितने म्हटलं.