खोपोली : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद कर्जत-खालापूर मतदारसंघावरून विकोपाला गेलेला असतानाच आता या मतदारसंघावर भाजपचीही नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे किरण ठाकरे इच्छुक असून त्यांच्या मतदारसंघात भेटीगाठी सुरू झाल्याने कर्जत मतदारसंघाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
महेंद्र थोरवे हे कर्जत-खालापूरचे शिवसेनेचे आमदार आहेत. तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. अशातच भाजपनेही या मतदारसंघावर अप्रत्यक्ष हक्क सांगायला सुरुवात केल्याने महायुतीतील वाद विकोपाला जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
– Advertisement –
हेही वाचा… One Nation One Election : निवडणुकांचं महत्त्व इतकंच वाटतंय तर…; राज ठाकरेंची सरकारकडे मागणी
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे. याच मतदारसंघातून तीन वेळा राष्ट्रवादीने आमदार दिला आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असून सुधाकर घारे त्यांचे इच्छुक उमेदवार आहेत. अशातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले किरण ठाकरे सध्या संपर्क वाढवात आहेत. रवींद्र चव्हाण यांनीच किरण ठाकरे यांना निवडणूक लढण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
– Advertisement –
हेही वाचा… Raigad Accident : रायगडमध्ये पुन्हा भीषण अपघात, तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू
कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युतीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देईल, असा थेट इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी श्रीवर्धनमध्ये दिला होता. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाने महायुतीचे काम केले नाही, असा आरोपही आमदार थोरवे यांनी केला होता. त्यामुळे कर्जतवरून महायुतीत वाद असल्याचे जगजाहीर आहे. त्यातच भाजप एन्ट्री करत असल्याने वाद कुठल्या टोकाला जाईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
(Edited by Avinash Chandane)