बीएसएनएलचे सदस्य वाढले: जुलै महिन्यात देशातील आघाडीच्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये पूर्वीच्या तुलनेत २०-२१ टक्क्यांनी वाढ केली होती, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. कंपन्यांच्या या निर्णयावर ग्राहकांची नाराजी सोशल मीडियावर उघडपणे व्यक्त होत होती. मात्र, रिचार्ज वाढवण्याचा निर्णय आता कंपन्यांना महागात पडणार असल्याचे दिसत आहे.
खरं तर, रिचार्ज महाग झाल्यानंतर, Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांचे ग्राहक झपाट्याने कमी झाले आहेत. तर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, जिओने जुलैमध्ये 7.58 लाख ग्राहक गमावले आणि व्होडाफोन आयडियाने 14.1 लाख ग्राहक गमावले. त्याच वेळी, एअरटेलने सर्वाधिक 16.9 लाख ग्राहक गमावले.
दुसरीकडे, खासगी कंपन्यांच्या उच्च शुल्काचा थेट फायदा बीएसएनएलला होत असल्याने स्वस्त रिचार्जसाठी ग्राहक सरकारी कंपनीकडे वळले आहेत. अहवालानुसार, जुलैमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या २९.३ लाखांनी वाढली आहे. त्यानंतर कंपनीने आपली सेवा सुधारण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधांवर काम सुरू केले आहे. पुढील एका वर्षात ग्राहकांना 4G सेवा मिळू शकते.