शेतीचे काम आटपून परत येणाऱ्या महिलांवर काळाचा घाला! वीज पडल्याने 11 महिला गंभीर जखमी तर एकाच जागीच मृत्यू  
रोमित तोंबर्लावार, एबीपी माझा September 21, 2024 09:43 PM

Gadchiroli News : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातल आरमोरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डार्ली गावातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या गावात वीज पडल्याने 11 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतीच्या कामासाठी डार्ली या गावात 12 महिला गेल्या होत्या. दरम्यान त्या शेतातील कामे आटपून परत येताना वादळ वारा सुरू होऊन वीज कोसळली. त्याच वेळी ही दुदैवी घटना घडली आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार, सध्या या जखमी महिलांवर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या  अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मात्र, या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे राज्यात पुन्हा पावसाचे (Rain) वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी पाऊस देखील पडला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं उघडीप दिली होती. पण आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

23 आणि 24 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता

राज्यात 23 व 24 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची हजेरी राहणार असून कोकण वगळता बहुतांश  राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. परतीचा प्रवास सुरु होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात आता परतीचा पाऊस राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात सुरु झाल्याचं हवमान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

परभणीत अनेक दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी

परभणीत अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह परिसरात मागच्या 1 तासापासून जोरदार पाऊस बरसतोय. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या काळात जोरदार पाऊस बरसत असल्याने जे सोयाबीन आणि कापुस अतिवृष्टींतून बचावला आहे, तो ही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.