सध्या इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये घनघोर संघर्ष सुरु आहे. ज्या भागात लेबनानची सीमा इस्रायलला लागते तिथे ही लढाई सुरु आहे. दोन्ही बाजूकडून रॉकेट, मिसाइल डागले जात आहेत. बॉम्बचा वर्षाव सुरु आहे. इस्रायलने मागच्या आठवड्यात मंगळवारी लेबनानमध्ये आधी पेजर ब्लास्टर नंतर वॉकी-टॉकी ब्लास्ट केले. त्यानंतर हा संघर्ष अधिक चिघळला. इस्रायलने त्यानंतर एअर स्ट्राइक करुन काही दहशतवाद्यांना संपवलं. हिज्बुल्लाह सुद्धा रॉकेट हल्ल्याने उत्तर देत आहे. दक्षिण लेबनान हा हिज्बुल्लाहचा प्रमुख तळ आहे. इथली सीमा इस्रायलला लागून आहे. तसं बघायला गेलं, तर हिज्बुल्लाह-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या या संघर्षाशी भारताचा काही थेट संबंध नाहीय. पण इस्रायल-लेबनान सीमेवर भारतीय सैन्याचे 600 जवान तैनात करण्यात आले आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हिज्बुल्ला-इस्रायलशी युद्धाशी भारताचा काय संबंध? भारतीय जवानांना त्या सीमेवर का तैनात केलय? त्यामागे एक कारण आहे. युनायटेड नेशन्सच्या इंटरिम फोर्स अंतर्गत भारतीय जवानांची तैनाती करण्यात आलीय. ब्लू लाइनवर शांतता कायम ठेवणं हा या जवानांचा उद्देश आहे. पण इस्रायल आणि लेबनान त्यांना तिथे शांतता प्रस्थापित करु देत नाहीयत. इस्रायल आणि लेबनानमध्ये 120 किलोमीटर लांब सीमा आहे. त्याला ब्लू लाइन म्हणतात.
भारतीय सरकारची प्रत्येक घडामोडीवर नजर
भारतीय सैन्य आणि सरकारची ब्लू लाइनवर आता थेट नजर आहे. भारतीय जवान तिथे तैनात असल्यामुळे प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. संयुक्त राष्ट्राने वर्ष 2000 मध्ये UNFIL ची स्थापना केली. ब्लू लाइनवर दोन्ही देशांमध्ये चिथावणी, संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये हा उद्देश आहे. या सीमेवर UNFIL च सैन्य तैनात असतं. अन्य देशांचे जवान सुद्धा यामध्ये असतात. खरंतर ब्लू लाइन फक्त सीमा नाहीय, एक बफर झोन आहे. बफर झोनमध्ये यूएनच्या शांती सैन्याच पेट्रोलिंग सुरु असतं. दशकांपासून भारतीय जवान या सीमेवर तैनात आहेत.