समृद्धी महामार्गावरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सिला "ब्रेक"! वाहनधारकांच्या अनेक तक्रारीवरून MSRDC ची कारवाई
डॉ. संजय महाजन September 24, 2024 03:13 PM

Samruddhi Expressway:  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) टोलची रक्कम मोठी असूनही टोल नाक्यांवर सुविधा मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी वाहनधारकांनी केल्या आहेत. सततच्या या तक्रारांची दखल घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 69 नोटिस बजावल्या होत्या. असे असताना टोल वसुली करणाऱ्या कंपनीने आपल्या कामात कुठलेही सुधारणा न केल्याचे बघायला मिळाले. परिणामी, समृद्धीवरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सीचा कंत्राट आता एमएसआरडीसीने  (MSRDC) रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तब्बल 69 नोटिस, तरीही परिस्थिती जैसे थेच!  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोल कलेक्शन करणाऱ्या या एजन्सी विरुद्ध अनेक तक्रारी एमएसआरडीसी (MSRDC) कडे आल्या होत्या. या तक्रारीत टोल नाक्यावर शौचालयाचा अभाव, तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा नसणे , कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर न मिळणे, टोल वसुली कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक या विषयीच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने एमएसआरडीसी ने टोल वसुली करणाऱ्या "रोडवेज सोल्युशन्स " कंपनीला तब्बल 69 नोटिसेस बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्याने या कंपनीचा ठेकाच आता रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करूनही वाहनधारकांना सुविधा मिळत नसल्याची अद्यापही वाहनधारकांची ओरड कायम आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

 पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग पूर्वी ‘एनएचएआय’मार्फत करण्यात येणार होता. त्याला मान्यताही देण्यात आली होती. मात्र, एप्रिल दरम्यान हा महामार्ग ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआयडीसी’ यांच्यात झालेल्या करारानुसार ‘एमएसआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात आला. त्यामुळे त्या प्रकल्पावर ‘एमएसआयडीसी’ मार्फत काम करण्यात येत आहे.

महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर

पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असून ५३ किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरूरपर्यंत पोहचणार आहे . त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे . मात्र आता हा प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर आणि तिथून पुढे छत्रपती संभाजी नागरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय . त्यासाठी आणखी 2050कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9565रुपये इतका येणार आहे . या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असणार आहे .

हे ही वाचा 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.