सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या टी 20I सामन्यात बांगलादेशला 20 ओव्हरच्या आतच गुंडाळलं आहे. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने बांगलादेशला 19.5 ओव्हरमध्ये 127 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे काही अपवाद वगळता बांगलादेशच्या फलंदाजांना फार वेळ मैदानात टिकताच आलं नाही. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक धावा केल्या. तर टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्थी आणि अर्शदीप सिंह यो जोडीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
मेहदी हसनने 32 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला 127 धावांपर्यंत मजल मारता आली. कॅप्टन नजमुल हुसेन शांतोने 25 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह 27 रन्स केल्या. तास्किन अहमद आणि तॉहिद हृदॉय या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावांचं योगदान दिलं. तर रिशाद हौसनेने 11 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. शोरिफूल इस्लामला हार्दिक पंड्याने दुसऱ्याच बॉलवर आला तसाच परत पाठवला. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली.
अर्शदीप सिंह याने 3.5 ओव्हरमध्ये 14 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थी याने 26 धावा देत तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मयंक यादवने पदार्पणातील पहिलंच षटक निर्धाव टाकत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची अप्रतिम सुरुवात केली. मयंकने 4 षटकांमध्ये एकूण 21 धावा दिल्या. आता भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांवर पुढची सर्व जबाबदारी आहे. भारतीय फलंदाज 128 धावांचं आव्हान किती षटकांमध्ये पूर्ण करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
भारतासमोर 128 धावांचं आव्हान
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), परवेझ हुसैन इमॉन, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम.