‘पराभव झाल्यानंतरही पंप्रधान नरेंद्र मोदी यांना दोष द्यायचा, यासारखं वाईट कृत्य कोणतं नाही. ज्या नेत्याला देशानं स्वीकारलं, ज्या नेत्याला जगानं स्वीकारलं. ज्या नेत्याचा बोलबाला संपूर्ण जगात आहे. त्याच्याविरोधात सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात लिहून काय फरक पडणार आहे?’, असा सवाल करत शिवसेना नेते आणि उदयोग मंत्री उदय सामंत यांनी सामना अग्रलेखावरील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. पुढे ते असेही म्हणाले, सामना या वृत्तपत्रात महायुतीच्या जाहिराती पहिल्या पानावर चालतात आणि आतमध्ये टीका असते. सामना वृत्तपत्रावर टीका करायची नाही पण त्याच्या मानसिकतेची कीव करावी वाटते. कारण ज्या नेत्याला सर्वत्र स्वीकारलं आहे. ज्या नेत्याला आता विश्वनेता म्हणून बघितलं जातं, त्याच्या टीका करून काही फरक पडच नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना फटकारलंय. तर सामनातून अशा टीका करण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार म्हणू जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला. त्यानंतर राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करणार असं वक्तव्य केलं, त्यावर सामानातून भूमिका मांडावी, असे म्हणत उदय सामंत यांनी टीका करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.