Women’s T20 World Cup : भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न कसं पूर्ण होणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
GH News October 09, 2024 05:14 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत आहे. साखळी फेरीतील सामने आता रंजक वळणावर आले असून एक जय पराजय उपांत्य फेरीचं गणित ठरवणार आहे. वर्ल्डकपसाठी दोन गट पाडले असून प्रत्येक गटात पाच संघ आहे. तसेच प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी 4 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे काहीही करून तीन सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. भारताचं गणित पहिल्याच सामन्यात बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी धुव्वा उडवला आणि सर्व चित्रच फिस्कटलं. भारताचं रनरेटचं गणितच किचकट झालं आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची संधी भारतीय संघाला होती. मात्र तिथेही हा फरक भरून काढता आला नाही. आता भारताचा तिसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. त्यामुळे भारताला हा सामना जिंकावा तर लागेलच पण नेट रनरेटचं गणितही सोडवावं लागणार आहे.

भारताचं गणित कुठे फसलं?

भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने साखळी फेरीतील प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने दोन पैकी दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि भारताने एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी दो गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या गणितात पाकिस्तानचा संघ उजवा ठरला आहे. 0.555 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड 2 गुण आणि -0.050 नेट रनरेटसह तिसऱ्या, भारत 2 गुण आणि -1.217 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेने दोन पैकी दोन सामने गमावले असून सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. भारताचा नेट रनरेट खूपच कमी असल्याने पुढचं गणित उर्वरित दोन सामन्यांवर आहे.

श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्यास अपयश आलं तर…

श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवण्यात अपयश आलं तर मात्र दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल. पाकिस्तानने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर गणित सुटू शकतं. यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा फायदा आहे. पाकिस्तानचे उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर 6 गुणांसह टॉपला जाईल. तर भारताने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर 6 गुणांसह टॉप दोन पैकी एका ठिकाणी स्थान पक्कं करेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे जास्तीत जास्त 4 गुण राहतील. त्यामुळे या गटातून भारत आणि पाकिस्तान हे संघ उपांत्य फेरी गाठतील. पण दोन्ही संघांनी उर्वरित सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.