सिंधुदुर्ग : जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने संपले असले तरी अद्याप परतीचा पाऊस राज्यातील काही भागात धुमाकूळ घालताना दिसत आहे. परतीच्या पावसानेही जाता जाता महाराष्ट्रातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेले पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोकणातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. (Farmers in Konkan in crisis due to return rains)
गेल्या 15 दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीला आलेली आहे. मात्र जिल्ह्यात दररोज होणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
– Advertisement –
मेहनतीने उभं केलेलं शिवार पाहून आनंदलेला शेतकरी कापणीचे स्वप्न पहात होता, मात्र सध्या भात शेती जमीनदोस्त झाली आहे. मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन शेती केली होती, असलेली पदरमोड करून बी बियाणे खते विकत आणून शेतकऱ्यांनी शेती केली होती. पीकं सुद्धा चांगलं आलं असतानाच आता ऐन कापणीच्या वेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.
– Advertisement –
जंगली प्राण्यांचा सतत वावर, त्यापासून शेतीचे संरक्षण करत असतानाच आता पावसाच्या पाण्याने शेतीच मोठ नुकसान झाल आहे. तर काही ठिकाणी कापणीच पीक पाण्यात राहिल्याने भात पिकाला परत कोंब येण्यास सुरुवात झाली आहे.
गुरांना लागणारा गवत अक्षरशः कुजून गेल्याने शेतकऱ्यांना याचाही फटका बसला आहे. याबाबत लवकरात लवकर कृषी अधिकाऱ्यांनी पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
दरम्यान, 1 ते 15 ऑक्टोबर या 15 दिवसांत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चार महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यातच परतीच्या पावसाच्या तडाख्यात राज्यातील सुमारे 30 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला भात, सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, कांदा, भाजीपाला अशी उभी पिके गेल्या 15 दिवसांत पूर्ण आडवी झाल्याचे समजते.
हेही वाचा – Jitada Fish : जिताडा उरला आठवणीपुरता, शेतकरी आणि खवय्यांची चिंता वाढली