Marathi Actors : विजय कदम (Vijay Kadam), अतुल परचुरे (Atul Parchure) आणि मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni) मराठी सिनेसृष्टीमधील या तिनही दिग्गजांनी अकाली एक्झिट घेतली. या तिघांच्याही जाण्याचा मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. कुणी रंगभूमी, कुणी सिनेमे तर कुणी गीतकार,पटकथा लेखक अशा भूमिका या तिघांनीही लिलया पेलल्या होत्या. त्यामुळे या तिघांच्याही कलेवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं.
काहीच दिवसांपूर्वी अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यानंतर आभाळमाया, वादळवाट या अजरामर मालिकांचे अजरामर शीर्षकगीत लिहिणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचेही निधन झाले. त्यामुळे एका दु:खातून सिनेसृष्टी सावरत असतानाच पुन्हा एकदा शोककळा पसरली. विजय कदम यांनीही काही महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. या तिन्ही दिग्गजांच्या एक्झिटवर दिग्दर्शक रवी जाधव यांनी भावनिक पोस्ट केली आहे.
रवी जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या तिन्ही कलाकारांचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर मधील ‘कॉन्टॅक्ट’ जेव्हा अचानक आपल्यातून निघून जातात तेव्हा आपल्याकडे केवळ त्यांचे नंबर राहतात. नंबर्सच्या या जगात आपण एकामागून एक बरेच ‘एक नंबर’ कलाकार गमावत आहोत याची आठवण करुन देत राहतात. अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या तीनही महान कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली
विजय कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. 'विच्छा माझी पुरी करट हे त्यांचं लोकनाट्य आणि 'खुमखुमी' हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1980च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.
अतुल परचुरे यांनी पु.ल.देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली या नाटकातून अगदी हुबेहुब भूमिका साकारली होती. पण त्याची खरी झाली होती ती, नातीगोती या नाटकामुळे. या नाटकात त्यांनी दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू यांच्यासोबत रंगभूमी गाजवली होती. 'वासूची सासु', 'प्रियतमा', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकांमधल्याही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
आभाळमाया, वादळवाट यांसारख्या प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिकांच्या शीर्षकगीतांना आकार देणार गीतकार म्हणजे मंगेश देसाई मंगेश कुलकर्णी यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमधलही गाणी लिहिली आहेत. प्रहार, आवारा पागल दिवाना, मुस्तफा , येस बॉस यांसारख्या हिंदी सिनेमांचं त्यांनी पटकथालेखक म्हणून जबाबदारी स्वीकारली. मंगेश कुलकर्णी यांच्या शब्दांची किमया शाहरुखानच्या येस बॉस या सिनेमातही पाहायला मिळाली.
View this post on Instagram