Maharashtra Assembly Election 2024: कोकणात 'शिवसेना' विरुद्ध 'शिवसेना
esakal October 23, 2024 11:45 AM

रत्नागिरी: गेली पंचवीस वर्षे वर्चस्व अबाधित राखणाऱ्या आणि ग्रामीण भागात घराघरांत रुजलेल्या शिवसेनेचे अडीच वर्षांपूर्वी दोन तुकडे झाले. या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे पुरती बदलली. या विभाजनाचा फटका सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला बसला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठपैकी पाच ते सहा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी ‘काँटे की टक्कर’ अनुभवायला मिळणार आहे.

मुंबईशी नाळ असलेल्या कोकणी माणसाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे पाठबळ दिले. ठाकरे यांचे विचार आणि मराठी माणसासाठी असलेली अस्मिता यामुळे अनेक कोकणी माणसे आपसूकच शिवसेनेकडे वळली. हळूहळू रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना चांगलीच वाढली. घराघरांत शिवसेनेचा धनुष्यबाण पोचला. त्याला साथ मिळाली ती भाजपची. त्यामुळे गेली ३० वर्षे शिवसेना-भाजप युतीने कोकणावर अधिराज्य गाजविले.

जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत युतीचा दबदबा होता. शिवसेनेचे तीन तर भाजपचे दोन आमदार होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले. उदय सामंत यांनी २००४ मध्ये भाजपचे आमदार बाळ माने यांचा पराभव केला तर गुहागरमध्ये आमदार विनय नातू यांचा भास्कर जाधव यांनी पराभव करत भाजपचा पारंपरिक मतदारसंघ काबीज केला. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत तर दापोलीतून संजय कदम आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगलाच जम बसविला. रत्नागिरी जिल्ह्यात २०१४ पासून पुन्हा समीकरणे बदलली

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे २०१४ पासून पुन्हा बदलली. सामंत यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ उतरवून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना मजबूत झाली. २०१९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने बाजी मारली; परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीला घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली. या सर्व घडामोडींमध्ये निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच राहिला; परंतु अडीच वर्षानंतर पुन्हा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.