“विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत पराभवाला जी कारण आहेत, ती माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यानंतर मी शांत होतो, आज मी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असं शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राजना साळवी बोलले. “माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ” असं राजन साळवी म्हणाले.
विनायक राऊत म्हणतात उदय सामंत यांना शह देण्यासाठी राजन साळवींना घेतलय. त्यावर राजन साळवी म्हणाले की, “शह-काटशह असं काही नाहीय. हातात हात घालून शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. 38 वर्ष राजन साळवीने शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाच पालन केलं आहे”
भाजपऐवजी शिवसेनेत का प्रवेश केला?
विनायक राऊतांवर तुमची नाराजी आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “विनायक राऊतांबद्दल नाराजी आहे, त्याची तक्रार मी उद्धव ठाकरेंकडे केली. ही वस्तुस्थिती आहे, पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रत मी आलो” भाजप ऐवजी शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? त्यावर ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सत्तेच्या अनुषंगाने तीन पक्ष महत्त्वाचे आहेत. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. आम्ही शांतपणे विचार केला. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सूचनेनुसार वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत? धनुष्यबाण कुठे आहे? हा विचार केला. आमचा निर्णय योग्य आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असं म्हटलं होतं, त्यानुसार निर्णय घेतला”
विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे का?
विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे का? यावर राजन साळवी म्हणाले की, “मी अनेक पदांवर काम केलं आहे. माझ्या नावासमोर तीनदा आमदार लागलं. मी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबात गेलो आहे. ते ठरवतील, त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी मोठ्या भावासारखं प्रेम द्यावं” अशी अपेक्षा व्यक्त केली.